Sunday, January 26, 2020

हिंदुत्वच का? मनसे पक्षातील कार्यकर्त्यांची घुसमट होतेय का?



राज ठाकरे यांनी हिंदुत्व हाती काय घेतलं सर्वांच्याच पोटात दुखायला लागलं दुसऱ्याचं जाऊ द्या हो.
राज ठाकरे यांचे हिंदुत्व हाती घेणे हे काही कार्यकर्त्यांनाही आवडलं नसावं किंवा ते संभ्रमात देखील असतील म्हणून हा लेख लिहवासा वाटतोय....

आता मराठी मुद्याचं काय होणार? मराठीसाठी कोण झटणार? आपल्या पक्षात सर्वच जाती धर्माचे लोक आहेत त्यांना काय वाटेल? ते आता आपल्या मनसेत कसे राहतील वगैरे वगैरे.

संपूर्ण भारतावर खूप काळ मोघलांनी राज्य केलं ही गोष्ट सर्वश्रुत आहेच. मोघलांनी जनतेचा अमानुष छळ केला.

म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य हाती घेतले त्यात सर्व जाती धर्माच्या लोकांचाही समावेश होता.

छत्रपतींनी कधी कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही धर्माचा अपमान केला नाही.. किंवा हिंदवी स्वराज्य स्थापन करतोय म्हणून मुसलमानांवर अत्याचार केले नाहीत. उलट छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याशी प्रामाणिक असलेल्या मुसलमानांनाही त्यांनी आपलेसे केले होते आणि त्या मुसलमानांनी देखील छत्रपतींना रयतेचा राजा म्हणून स्वीकारले होते..

भारताला अकबर, टिपू सुलतान यांच्या सारखे राजे देखील लाभले आहेत अशी असंख्य उदाहरणे देता येतील ज्यात अनेक मुसलमान राजांनी देखील कोणत्याही धर्माचा अपमान केला नाही म्हणूनच आज इतिहासात त्यांची महान योद्धे म्हणून नोंद झाली आहे.

अश्या योध्यांना सर्व जाती धर्मातील रयतेची साथ लाभली मग ते राजे धर्माने कोणीही असोत. मुसलमानांनी देखील येथील मातीसाठी आपले बलिदान दिले आहे हे कुणीच नाकारू शकणार नाही.

टीप- येथे मी कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही योध्याशी तुलना करीत नाही, फक्त उदाहरण म्हणून देत आहे.. कारण कोणत्याही योध्याशी कुणाचीही बरोबरी होऊ शकत नाही.. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा नकोत म्हणूनच इतिहास असतो इतिहासातून जे चांगले आहे ते घ्यावे आणि जे वाईट आहे ते सोडावे..

पण आजकालची जनताही तशी राहिली नाही ना आजकालचे राजकारणी.. 

"आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय" अशी गत जनतेची झाली आहे...

जनतेच्या भावनेला हात घालून आपले काम साध्य करून घ्यायचे मग जनता मरो की जगो त्याच नेत्यांना काही घेणं देणं नसते.. असे आजकालचे राजकारणी लोक आहेत..

म्हणूनच येथे म्हणावेसे वाटते की "पूर्वीचे नेते राजनेते होते जे राजनीती करायचे, हल्लीचे नेते राजकारण करतात म्हणून ते राजकारणी म्हणून ओळखले जातात..."

तुम्ही अगदी तुमच्या मनावर हात ठेवून सांगा तुम्हाला तुमच्या जातीचा किंवा तुमच्या धर्माचा आरक्षणा व्यतिरिक्त किती फायदा झाला आहे..? कोणता धर्म हिंसा करा असे सांगतो? निसर्गाने कधी जात धर्म पाहून भेदभाव केला आहे का? तो सर्वांनाच सारखा ठेवतो ना? मग राजकारणात असे का होते ते आपण जाणून घेऊया..

सर्वसामान्यांच्या जीवनापेक्षा राजकारणी लोकांचं जीवन खूप वेगळे असते. त्यात भावनेला थारा नसतो आणि ते भावनिक झाले तरी ते फक्त राजकारणासाठीच. काहीच राजकारणी हे प्रामाणिक असतात आपल्या तत्वांशी कधीच तडजोड करीत नाहीत..

राजकारणी लोक इतके बुद्धीने तल्लख आणि हुशार असतात की त्यांना माहीत असते की लोकांना काय हवंय! ते आणि तेच ते जनतेला पुरवतात.. उदा.. 

१. पैसे वाटणे, दारू आणि मटणाच्या मेजवान्या ठेवणे, एखादा मुद्दा उचलून कार्यकर्त्यांना भडकवून त्यांच्या मार्फत आपले काम साधून घेणे मग त्या कार्यकर्त्यांचे काहीही होवो.

२. नेत्यांनी खांद्यावर हात टाकून फोटो काढला की कार्यकर्ते त्या नेत्याला डोक्यावर घेतात. त्यात त्या नेत्याचा मोठेपणा दिसतो तर कार्यकर्त्याला त्या एका फोटोने समाजात स्थान मिळते.

३. कार्यकर्त्यांच्या मोठमोठ्या चूकीच्या भूमिकेला देखील पाठीशी घालणे.

४. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोलायचे एक आणि करायचे एक असे वागणे.

४. जातीपातिचे नीच राजकारण खेळून, दंगे घडवून त्यावर सतत चर्चेत राहणे वगैरे वगैरे...

पण राज ठाकरे यांच्या बाबतीत तरी वरील सर्व गोष्टी आज पर्यंत तरी खोटे ठरत आलेल्या आहेत. उदा...

१. राज ठाकरे ह्यांनी कधीही गर्दी जमविण्यासाठी किंवा मतदानासाठी दारूच्या आणि मटणाच्या पार्ट्या किंवा पैश्यांचे वाटप केलेलं माझ्या पाहण्यात किंवा ऐकविण्यात नाही.

२. मराठीच्या मुद्यांवर त्यांनी प्रखरतेने बाजू मांडत कार्यकर्त्यांना आणि मराठी जनतेला जागे केले, त्यासाठी अनेक आंदोलने झाली आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर केसेस पडल्या. हे जरी खरं असले तरी राज ठाकरे यांच्यावरही शंभरहुन अधिक केसेस आहेत ह्यावरून स्पष्ट होते की त्यांनी नुसत्या कार्यकर्त्यांनाच कोर्ट कचेरीत अडकवले नाही तर त्या भूमिकेत ते स्वतःही कार्यकर्त्यांप्रमाणेच तितकेच मराठीसाठी झटत राहिले आहेत हे सिद्ध होते.

३. जेंव्हा कार्यकर्ते त्यांना भेटायच्या निमित्ताने येतात तेंव्हा सर्वांनाच फोटो काढण्याचा मोह होतो.. तेंव्हा "माझ्याकडे यायचं असेल तर काम घेऊन या, फोटो काढण्यासाठी नको." "तुम्ही असं काहीतरी चांगलं काम करा की मला तुमच्या सोबत फोटो काढवासा वाटेल" असं भर सभेत कार्यकर्त्यांना सांगणारा एकही नेता तुम्ही तरी पहिला आहे का?..

४. चुकीची भूमिका घेणाऱ्यां पदाधिकाऱ्यांना ही त्यांनी कधीच पाठीशी घातले नाही हे त्यांच्या २३ जानेवारीच्या सभेत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे सोशल मीडियावर होणाऱ्या वादांवर आपली भूमीका स्पष्ट करीत झापले. ते स्पष्ट म्हणाले की "सोशल मीडियावर कोणताही पदाधिकारी आपापसात वाद घालताना आढळला तर तो कोणीही असो त्याला लगेच पदावरून हटविले जाईल" असं ठामपणे बोलणारा कोणता ही नेता तुम्ही तरी पहिला आहे का?

५. जातीपतींचं राजकारण त्यांनी कधीच केले नाही, उलट लोकांना सांगत आले की "माझ्या महाराष्ट्रातील मुसलमान जिथे राहतो तिथे कधीच दंगली घडणार नाहीत" फक्त जे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विरोधात बोलतात किंवा कृत्य करतात त्यांंनाच त्यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.

६. जे ते बोलले त्यावरून त्यांनी कधीच माघार घेतली नाही जे बोलले ते बोलले त्यांचे शब्द त्यांनी कधीच फिरविले नाही नाशिक महानगर पालिकेमध्ये त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी, चांगले प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेले परंतु त्या बदल्यात पुढील निवडणुकीत त्यांना शेवटी हारच पत्करावी लागली.

शेवटी राज ठाकरे ९ मार्च २०१७ मध्ये मनसेच्या ११व्या वर्धापन दीनात राज ठाकरे म्हणाले की आज "काम हरले आणि पैसा जिंकला" आणि त्यानंतर हे ही म्हणाले की "ज्यांनी मनसेला मतदान केलं त्यांचे आभार परंतु जनतेला काम दाखवून पण ज्या जनतेने मनसेला मतदान केले नाही त्यांनी मला शिकवले की निवडणूक कशी लढवायची असते"... 

त्यावेळी काय म्हणाले होते राज ठाकरे..👇



एखादा सतत प्रामाणिकपणाने चांगले काम करीत असेल आणि त्याला मोबदल्यात जर सारखा पराभवच मिळत असेल तर त्या प्रामाणिकपणाचे करायचे काय? तुम्ही एकदा तरी स्वतःला राज ठाकरे यांच्या जागी ठेवून पहा आणि मग विचार करा...

जास्तीत जास्त मतदार जात, धर्म, पैसा पाहूनच मतदान करतात, मतदारांनी केलेल्या विकासाच्या कामांवर मतदान केले असते तर, राज ठाकरेंनी कशाला झेंडा बदलून हिंदुत्व हाती घेतले असते..?

मग राज ठाकरे यांच्यावर अजेंडा आणि झेंडा बदलल्यावर टीका करण्यात काय तथ्य आहे? हे प्रत्येकाने विचारात घेतले पाहिजे..

हिंदुत्व पेक्षा रस्ते, वीज, पाणी हे मुद्दे गरजेचे आहेत हे जरी खरं असलं तरी लोक जर मतदान धर्म आणि जातींवरच करणार असतील तर माझ्या मते तरी राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्यच वाटतो.. कारण जनतेला जे हवाय तेच ते करत आहेत मग यात गैर ते काय? राजकारणात जनतेला जे हवं आहे तेच द्यावं कारण युद्धात सर्व माफ असतं.

आजकाल ज्याला "हिंदू" या शब्दाचा अर्थ देखील माहीत नाही तो ही राज ठाकरे यांच्यावर आग पाखड करायला सज्ज आहे..

हिंदुत्व हाती घेणे म्हणजे मराठीचा मुद्दा सोडणे असे होत नाही आणि हिंदुत्व हाती घेणे म्हणजे मुसलमानांवर अत्याचार करणे असाही होत नाही..

मग मनसेला आणि राज ठाकरे यांना मानणारे मराठी किंवा मुसलमान जनतेने किंवा कार्यकर्त्यांनी नाराज व्हायचे कशाला?

राज ठाकरे सारखा प्रामाणिक, कर्तृत्ववान, वैचारिक आणि तल्लख बुद्धी असलेला नेता महाराष्ट्राला आणि मनसे पक्षाला लाभला आहे याहून भाग्य तो काय?

अश्या नेत्याने जर हिंदुत्व हाती घेतले असेल, तर नक्कीच ते कोणत्याही मुसलमानांवर आणि कोणत्याही मराठी किंवा अमराठी हिंदूंवर उगाच आपली धगधगती तोफ डागणार नाहीत निदान इतका विश्वास तरी प्रत्येक महाराष्ट्रातील मराठी माणसांनी, महाराष्ट्रातील हिंदू मुसलमान कार्यकर्त्यांनी तरी ठेवलाच पाहिजे.

मित्रांनो तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल पण अख्खा महाराष्ट्र तुम्हाला एक महाराष्ट्र सैनिक म्हणूनच ओळ्खतोय..

तुमची ओळख ही राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेमुळे आहे आहे हे कधीच विसरू नका.

म्हणूनच चिंता सोडा आणि सन्मानीय हिंदुहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याचे कार्य आपल्या हातून घडो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना... जय हिंद जय महाराष्ट्र..


                                                    ©मिलिंद पालांडे©

No comments:

Post a Comment